बुधवार, ३१ डिसेंबर, २०२५

उसंत

'मनाचा ब्रेक हा उत्तम ब्रेक' असे वाचण्यात आलेच असेल. त्यातला ब्रेक हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. जसा गाडीच्या स्पीडला अधनं मधनं ब्रेकची गरज असते. तसेच माणसाच्या रुटीनला सुद्धा ब्रेकची गरज असते... हा रुटीन मधला ब्रेक... तसे सगळेच घेताना दिसतात पण रोजची किंवा दोन चार दिवसांनी मिळणारी उसंत मात्र घेताना दिसत नाही. कारण एकच आहे माणूस धावत सुटला आहे. पूर्वी नोकरी 9 ते 5 या वेळेत असायची त्यामुळे कुटुंबाचा सहवास मिळायचा...न चुकता रोजचा संवाद, एकमेकांसोबत वेळ घालवणे होते.  थोडा फेरफटका ,मित्रांशी, शेजाऱ्यांशी संवाद होता. चालणं होत होतं... त्यामुळे माणसं भेटायची. बस आणि ट्रेनमुळे ग्रुप जमले होते.  त्यांचे पत्त्यांचे डाव, गप्पाटप्पा, अंताक्षरी यासारखे अनेक कार्यक्रम व्हायचे. माणूस माणसात होता.. त्यामुळे तो खिदळायचा, हसायचा, खेळायचा, भडाभडा बोलायचा... आत्ता जगायची समीकरणे थोडी बदलली आहेत. माणूस कार मध्ये असो ट्रेनमध्ये असो किंवा बस मध्ये  मोबाईल हातात आल्यामुळे माणसं बोलायला विसरली आहेत... डोळे हे मोबाईलवर असल्यामुळे समोरचं बघणं विसरली आहेत... आणि कानात हेडफोन असल्यामुळे ऐकायला विसरली आहेत. 


आजकाल job मध्ये target असतात. त्यामुळे कामाचे तास वाढलेत. माणसाकडून मशीन सारखे काम करण्याची अपेक्षा केली जाते... त्यामुळे आठ तासाचे 18 तास झालेले आहेत. Family time साठी weekend ची वाट पाहावी लागते... फ्रेंड सर्कल बरोबर picnic arrange केली जाते. सध्या आवड असेल तरी सवड काढता येत नाही... सवड मिळाली तरी मोबाईल ला वेळ दिला जातो. निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर निसर्ग ... डोळ्यात साठवता आला पाहिजे ... देव दर्शनाला गेल्यावर ... देवाला डोळे भरून पाहता आलं पाहिजे ... पण सेल्फी आणि फोटो काढण्याच्या नादात आपण मनाची एकाग्रता हरवून बसलो आहोत.


80 आणि 90 च्या कालावधीत किंवा त्याच्या आधी आवडीच्या गोष्टीसाठी वेळ काढला जात होता. एकत्र टीव्ही पाहणे, क्रिकेटची मॅच बघणे , सिनेमा पाहणे, पुस्तक वाचणे, magazine, दिवाळी अंक, गोष्टीची पुस्तक ,पेपर वाचणे, एकत्र फिरायला जाणे, वर्षभरातले सगळे सण ... उत्सव एकत्र साजरे करणे,  चाळीतल्या किंवा सोसायटीच्या कार्यक्रमात सहभागी होणे,  घरातला उत्सव साजरा करता करता मंडळाचा उत्सवातला... उत्साह टिकवणे, मार्केटमध्ये जाणे, मित्राच्या घरी पत्त्याचा डाव खेळणे, सुट्टीत गावाला जाणे आपल्या माणसांना भेटणे, फोटोचे अल्बम बघणे, रेडिओ वरची गाणी ऐकणे, गप्पांची देवाण-घेवाण आणि विचारांची clarity होती. टीव्हीवरील आवडीचे कार्यक्रम पाहणे, खेळणे, लोळणे, झोपणे, चालणे, ऐकणे, बघणे, बोलणे या क्रिया रोजच्या रोज होत्या.


सध्या असे आहे की ... कामातून थोडीशी फुरसत मिळाली की मोबाईल हातात घेतला जातो. पूर्वी हातात वेळ होता आणि घरातल्या माणसाची ओढ होती. आता हातात मोबाईल आल्यामुळे... ती ओढ मोबाईलला connect झाली आहे. बराच वेळ मोबाईल बघितला नाही की चुकल्यासारखे होते.  त्यामुळे माणसा ... माणसामधील संवाद हरवत चालला आहे. कामापुरते बोलले की झाले...कुटुंबाशी, मित्रांशी संवाद होताना दिसत नाही. अनेक मिनिंग लेस आणि फालतू रील्स scroll होतात. त्यात आपला बराच वेळ वाया जातो हे आपल्याला कळत सुद्धा नाही. त्यात चांगल्या रिल्स पण येत असतात. सुमन कल्याणपूरकर याचे सुंदर भावगीत, पु.ल. चा  विनोद, किशोर कुमार च्या आवाजातलं ( ए मेरे दिल सुना कोई कहानी ) गोड संगीत... पण scroll करत असताना आपल्याला थांबायचं नसतं... त्यामुळे थोडं थांबा... श्वास घ्या... प्रसन्न हसरी सकाळ... पक्षांचा किलबिलाट... मंदिरातला घंटा नाद... हिरवीगार झाडं... रंगीबेरंगी फुलं... एखादा फेरीवाला... माणसाच्या गर्दीत हरवलेला सूर्योदय आणि सूर्यास्त... अधून मधून दिसणारी लहान बाळ...  त्यांचे पाणीदार डोळे, गोड हास्य... नकळत दिसणारे आकाश... रात्रीचे चांदणे... कधी कधी दिसणारा चंद्र... एखादे रंगीत फुलपाखरू उडत असते आजूबाजूला.. पण आपले मात्र लक्ष नसते. दिवसातला  मिळणारा  मोकळा वेळ आपण फक्त मोबाईल ला देतो.  सतत scroll केल्यामुळे आपली स्मरणशक्ती आणि एकाग्रता कमी होते.  स्क्रीन टाईम चा एक विशिष्ट टाईम असणे गरजेचे आहे. कारण मोबाईल ही गरज राहिली नसून व्यसन  झाले आहे. याचा परिणाम म्हणजे आपण... आपली सुंदर आणि पुरेशी झोप सुद्धा घेत नाही... त्यामुळे busy schedule मधून उसंत मिळाली की मोबाईलला दूर ठेवा... आणि स्वतःला मोकळीक द्या.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

उसंत

'मनाचा ब्रेक हा उत्तम ब्रेक' असे वाचण्यात आलेच असेल. त्यातला ब्रेक हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. जसा गाडीच्या स्पीडला अधनं मधनं ब्रेकच...